इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी   

 

मुंबई,(प्रतिनिधी) : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी ’महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण-२०२५ ला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या धोरणात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या सवलती जाहीर करताना, टोल मध्येही मोठी सवलत देण्यात आली आहे. मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग, अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग (समृद्धी महामार्ग) यावर प्रवास करणार्‍या सर्व चारचाकी प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना व बसना टोल पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. तसेच, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील अन्य राज्य व राष्ट्रीय महामार्गावर चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांना टोलमध्ये पन्नास टक्के इतकी सवलत देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
 
पेट्रोलियम पदार्थांचे सतत वाढणारे दर, त्याच्या आयातीसाठी लागणारे परकीय चलन व प्रदूषण या सर्व बाबींना आला घालण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यात धोरण केंद्र सरकारने स्वीकारले आहे. राज्यांनीही याबाबत काही निर्णय घ्यावेत, असे केंद्राने सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमडळाच्या बैठकीत काल इलेक्ट्रिक वाहन  धोरणाला मान्यता देण्यात आली. २०३० पर्यंत हे धोरण लागू राहणार आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी येत्या पाच वर्षांसाठी १ हजार ९९३ कोटींच्या निधीच्या तरतुदीसही मान्यता देण्यात आली.
 
मोटार वाहन करात माफी 
 
या धोरणांतर्गत स्वच्छ गतिशिलता संक्रमण मॉडेल राबवले जाणार आहे. याअंतर्गत २०३० पर्यंत राज्यातील वाहतूक क्षेत्रातून होणारे कार्बन तसेच प्रदूषणकारी वायू, तसेच हरित गृह वायू उत्सर्जने रोखण्याचे उद्दिष्ट आहे. या धोरणांतर्गत राज्यात विक्री व नोंदणी झालेल्या सर्व इलेक्ट्रिक वाहनांना मोटार वाहन करातून तसेच नोंदणी प्रमाणपत्राच्या किंवा नूतनीकरण शुल्कातून माफी देण्यात आली आहे. राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार होण्यासाठी राज्यामध्ये चार्जिंग विषयक पायाभूत सुविधांचा भक्कम विकास करण्यात येणार आहे. 
 

Related Articles